💸 *औदार्याचा धंदा*💸
-गजानन देशमुख
-----------------------------------------------------------------
आणि टाळ्यांच्या कडकडाटात आनंद आपल्या जागेवर जाऊन बसला.. "शाब्बास आनंद ; येत्या परीक्षेत पण हाच क्रमांक कायम ठेवायचाय बरं का", पाटील सरांनी असं म्हणून आनंदला, यश प्राप्तीचा आनंद झटकून पुढल्या आव्हानाला पेलण्यासाठी सज्ज राहण्याचं सूचना वजा आवाहन केले! पहिल्या बाकावर बसणारा आनंद कायम वर्गात अव्वल असायचा ; शिक्षकांची शाबासकीची थापच ह्या पैलवानाचा खुराक होता!
आनंदचे तीर्थरूप श्रीपती ; नावाचा प्रचलित अपभ्रंश होऊन हे शिरपती झाले! शिरपती नगरपालिकेचा सफाई कामगार होता! गावातील गटारी साफ करण्याऐवजी नुकतीच त्याच्यावर घंटागाडीत कचरा गोळा करण्याची जबाबदारी येऊन पडली होती.अत्यंत करूण चेहर्याचा हा इसम मात्र आपल्या कामात आनंदी आणि समाधानी होता म्हणून "थोडा और"चा धसका ह्या पठ्ठ्याने केव्हाच घेतला नाही..
शिरपतीच्या बारश्यात त्याच्या आत्याने पण कदाचित उपहासाने त्याचं नामकरण केलं असावं : नाहीतर काय , प्रस्थापितांच्या दृष्टीने पाहिल्यास घरात अठराविश्व दारिद्र्य, श्री चा काही पत्ता नाही आणि हा कसला आलाय श्रीपती! पण "श्री" श्रीपतीच्या घरी धनलक्ष्मीच्या नव्हे तर गृहलक्ष्मीच्या रूपात रखमा म्हणून वास करायची म्हणूनच श्रीपतीची श्रीमती सुद्धा लंकेची पार्वती होती! त्यांच्या संसारात गरीबीतही श्रीमंती होती कारण त्यांच्या कडे स्वाभिमानाची संपत्ती होती आणि आनंदाचं वैभव होतं ; समजावतो :
ह्या श्रीपतीच्या समाधानी असण्याचं कारण म्हणजे रखमा!संसारशकटाचे संचालन करताना सोबत्याची वर्तणूक शकटाची दिशा निर्धारित करते! तिच्या भौतिक गरजा अत्यल्प होत्या ; तिला ना जरीची चोळी हवी होती ना काठाची साडी, सोन्यासारखा संसार असताना काय ठेवलय त्या सोन्याच्या दागिन्यात असा मानस होता तिचा! म्हणून तिच्याजवळ असणार्या संसाधनांची उपयोगिता तिच्यास्तव अत्युच्च होती ; आणि अर्थाशास्त्रात ह्यालाच तर समाधान म्हंटलय ना! श्रीपतीच्या 'पगारावर' घर धकवायचं कौशल्य हीस उत्तमप्रकारे अवगत होतं ; म्हणून तीने श्रीपतीच्या अंगात थोडंबहूत स्वाभिमानाचं रसायन भिनवलं ...श्रीपतीचे सहकारी दिवाळीला पाडवा मागत फिरायचे मात्र ह्याला तसलं काही करण्याचा विचार पण शिवायचा नाही!
तथाकथित मागासलेल्या या जोडप्यानं मात्र आनंदवर संस्कार करण्यात कसलीच कसुर बाळगली नाही.त्यांचे संस्कार केवळ मोठ्यांचा आदर बाळगणं ,नम्रता,स्तोत्रं पठण,भाषिक स्पष्टता अशा धाटणीचे नव्हतेच मुळी ; तर त्यांनी ह्याला चुकल्यास लहानांचीही माफी मागायला शिकवलं , थोरांचा भितीयुक्त आदर बाळगण्यापोक्षा आदरयुक्त भीती बाळगायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यावर ह्यांनी श्रमप्रतिष्ठेचे संस्कार केले.
अशाप्रकारे हे संसारचक्र आनंदात सुरू होतं! मात्र एक कलाटणी अशी मिळाली की तीने सगळीच उलथापालथ केली!
श्रीपतीचा गेल्या महिन्याचा पगार ही झाला नव्हता!५ दिवसांवर दिवाळसण होता. मात्र जीवनावश्यक गोष्टींचा साठा घरात मुबलक होता, बायको आणि पोर ही तसं समजूतदार होतं..
त्यांनी नव्या कपड्यांचा विषयही घरात काढला नाही कारण मर्यादित संसाधनांच्या वापराने अमर्यादित गरजांची पूर्ती करण्यास्तव गरजांच्या तीव्रतेचा क्रम लक्षात घेऊन तो जीवनावश्यक ते चैनीच्या असा असावा हा प्रो.राॅबिन्सचा सिद्धांत हे दांपत्य बेमालूमपणे आंमलात आणत होतं!
एकाएकीच पालिकेत एका एनजीओ चे ३ -४ स्वयंसेवक आले आणि मुख्याधिकार्यांच्या हस्ते सफाई कामगारांना कपडे आणि मिठाई देण्याचा मनोदय व्यक्त केला ; पगार न दिल्याचा रोष शमेल या हेतूने मुख्याधिकार्यांनाही भूरळ पडली! व्यक्तिवर्तनावर पडणारा सामाजिक प्रभाव की काय म्हणतात त्या अनुसारिता आणि आज्ञापालनाच्या संयुक्त प्रभावाने श्रीपतीनेही ती सहानुभूतीने दिलेली भेट स्वीकृत केली पण डाव इथेच पालटला कारण त्या स्वयंसेवकांनी सोबत छायाचित्रकार नेल्याचा पराक्रम गाजवला होता! मग काय ; श्रीपतीने घरचा असंतोष भोगला!
इकडे मात्र त्याचा वेगळाच परिणाम दिसणार होता.
सागर ने राहुलला खुणावलं "ए हे तर आनंदचे पप्पा आहेत रे"
राहूलने आनंदला ते शाळेसमोरचं त्या समाजिक संस्थेचं बॅनर दाखवलं ज्यात की आपल्या कार्याचा उदोउदो आनंदच्या बापाच्या फोटो आणि "जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपूले " या तुकाराम बावांच्या अर्धवट अभंगसकट छापल्या गेला आणि आनंदच्या पायाखालची जमीन सरकली ; आज पर्यंत कधीच आपल्या बापाची, त्याच्या पेशाची लाज न वाटलेल्या आनंदच्या डोळ्यात आज शरमेने अश्रू तरळू लागले! तो तसाच चुपचाप वर्गात गेला !
आनंदवर जळणार्या टवाळखोरांना आयती संधी चालून आली,"अरेरेरेरे अल्लाह के नाम पे दे दो भैय्या कोई भगवान के नाम पे दे दो जी" अशी उन्मादाने काठोकाठ भरलेली कुजबुज त्याच्या कानावर पडू लागली!
ऐकू येणारा प्रत्येक शब्द जणू त्याच्या जीवावर उठला होता... आनंद उठून उभा राहिला, मागे वळून पाहिलं मात्र तो बोलणार काय? काय देणार स्वाभिमानाचे दाखले? कारण आज तोच आज या प्रश्नाचे प्रक्षुब्ध होता की आपण केव्हा पासून गांजलो! आज पहिल्यांदाच आनंदचं वर्गात लक्ष नव्हतं! मन सतत त्याला खात होतं. शाळेची घंटा वाजली तसं त्याने झपाझप पावलं टाकीत घर जवळ केलं रस्त्याने जाताना ३-४ चौकात त्याला तेच बॅनर दृष्टीस पडले! आनंद घरी आला, हातपाय न धुता, गणवेश न काढता तसंच दप्तर धाडकन आदळून पलंगावर आडवा झाला.. रात्री श्रीपतीने जेवायला उठवलं त्याला मात्र डोळे उघडताच त्याला श्रीपतीची मूर्ती दिसली आणि क्षणार्धात तो फोटो आठवला ! आता त्याला सहन होणार नव्हतं , त्याच्या मोठ्याने दिलेल्या हुंदक्यात जणूकाही त्या तेजस्वी विद्यार्थ्यांचं सगळं धैर्य वाहून जाऊ लागलं! त्याने श्रीपतीला तोच सवाल केला की "नाना, कधीपासून गांजलो हो आपण?"
आजवर प्रतिदिन तो पोटाला पोटभर खात आला होता सरासरी २३०० उष्मांकापेक्षाही कैक जास्त म्हणून त्याने स्वतःला कधीच गरीबीच्या निकषात बसवून पाहण्याची तसदी घेतली नाही!
त्याचा असा प्रश्न ऐकून श्रीपती निरुत्तर झाला. पण श्रीपतीचा अहम् त्याच्या कृतीचं समर्थन केल्यावाचून राहणार नव्हता!
"अरं गरीब न्हाय तर कायए ! कलेक्टरची औलाद हाय का मंग तू!" तो नकळतपणे आनंदवर बरसला!
त्याक्षणी श्रीपतीचा अहम् जिंकला होता पण त्याने आनंदच्या " स्व "च्या पार चिंधड्या उडवून टाकल्या होत्या! बस्स! इतकीच ठिणगी वणवा पेटवायला पर्याप्त होती ; हिनेच उद्दीपक म्हणून भूमिका अदा केली आणि एका आत्मविश्वासू मुलामध्ये न्यूनगंडाची (inferiority complex) पाळंमुळं रुजवली!
अगदी आनंदचं वागणंच बददलं दुसर्या दिवशीपासून. पॅंट मध्ये ३६०° मध्ये खोसून शर्टींग केलेला सदरा आता बाहेर स्वातंत्र्य अनुभवू लागला,वर्गात शिक्षकांचा प्रश्न विचारून होण्याआधीच ताडकन उठणारा हात आता समोरच्या डेस्कशी मैत्री करून बसला होता! रोजच्या चिडवाचिडवीने त्याला त्रस्त करून टाकलं होतं, arrogance वाढला होता त्यातला परिणामत: त्याने पहिल्यांदाच त्या टवाळखोरांच्या चमूला अद्दल घडवली होती!
आता वर्गातली मुलं त्याला थोडी दबकून होती ; त्याची एकदमच दहशद निर्माण झाली म्हणून चार दोन भाटांनी येऊन त्याच्या त्या मारहाणीचा प्रसंग त्याच्या उपस्थितीत रंगवून सांगणं क्रमप्राप्त होतं!
कायम एकटा राहणारा आनंद आता ४-५ मोकाट मुलांच्या घोळक्यात वावरू लागला.अभ्यासात स्वारस्य तर काहीच उरलं नव्हतं,वाटू लागलं त्याला की सोडियम आणि क्लोरीन च्या अभिक्रियेने कुठे आपली गरीबी दूर होणार आहे! तथाकथित परिणाम हाच की ; आनंद ,आनंद राहिला नव्हता..जवळपास सगळंच पार पालटून गेलं होतं!
पाटील सर दोन महिन्यांची वैद्यकीय रजा संपवून पुन्हा रूजू झाले मधल्या काळात पोकळी निर्माण झाल्याने त्यांना लवकरात लवकर वर्गावर जायचं होतं, पाहायचं होतं पोटच्याहून प्रिय लेकरांना , अरे आणि हो त्यांना उत्सूकता लागली होती आपल्या लाडक्या आनंदला भेटण्याची, गेल्या चाचणीतील त्याचे मार्क ऐकण्याची, मधल्या काळातील वर्गातील घडामोडी त्याच्या तोंडून ऐकण्याची... मात्र जेव्हा त्यांनी वर्गात पाऊल ठेवलं तेव्हा पहिल्या बाकावर त्यांची नजर आनंदला शोधू लागली... "अरे आज आनंद आला नाही का रे राहूल?"
"आलोय नं सर" मागच्या बाकावरला आनंद लाजंकाजं उभा राहिला..
पाटील सर मोठ्याने ओरडले "आनंद! काय झालय काय तुला ?अरे मी काय बोलतोय तुला कळतय का............????तू मला शाळा सुटल्यावर भेटायला येणार आहेस"
आनंद शाळा सुटल्यावर स्टाफरूम मध्ये गेला आणि सरांना उडवाउडवीची उत्तरं देऊन निघाला कारण त्याचे टवाळखोर मित्र त्याची वाट पाहत थांबले होते!
गृहपाठाच्या वह्यांचा गठ्ठा घेऊन राहूल, कुलकर्णी सरांच्या मागून चालत आला.. पाटील सरांना तो टापटीप गणवेशधारी आनंद डोळ्यासमोर दिसू लागला, जो सरांनी सुट्टीवर जाण्याआधी पाहिला होता!
"ए राहुल! अरे बाळा कसायस? बरं इकडे ये नं मला काम आहे थोडं! " राहूल सरांसोबत मैदानावर आला.. " आणि काय रे आपल्या आनंदने तर नवा अवतार घेतलाय वाटतं", सर हसून बोलले! "नाही सर ते...... म्हणून तो असा वागतोय सर!आणि सर अाता तो आमच्यात डब्बापण खात नाहीये" राहूलने घडलेला प्रकार कथन केला!
बरं चल ते सोड,तू तो गायन क्लास सोडलाय की चालू आहे, सरने हळूच विषय बदलला कारण त्यांना आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं..
दुसर्या दिवशी सरांनी अभ्यासक्रमाबाहेरची कविता शिकवायला सुरू केली..
आनंद परिपाठानंतर उशीराने वर्गात आला.. सरांनी त्याला काहीच न बोलता वर्गात घेतलं!
तो आला तेव्हाचं कडवं सुरू होतं -
"कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे ; पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.... "
सरांनी जसं जसं स्पष्टीकरण द्यायला सुरू केलं तसं तसं आनंद पुढे कवितेतल्या सरांच्या पुरग्रस्त माजी विद्यार्थ्याच्या पात्रात स्वत:चं चित्र दिसू लागलं !
सरांनी पुढली कविता घेतली ती सुरेश भटांची गझल-
, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही!
.......
येतील वादळे, खेटेल तुफान , तरी वाट चालतो...
अडथळ्यांना भिऊन अडखळणे,
पावलांना पसंत नाही....
सरांची कविता सादर करतानाचा आवेश, त्यांचा आनंदसाठीचा उपदेश, संदेश त्या कवितेत प्रक्षेपित करू लागला...
आनंदला कळून चुकलं की पाणी कुठं मुरलं!
तो तास संपताच सरांच्या मागे धावत गेला,आणि कडकडून त्याने सरांना मिठी मारली , तशी त्याची आसवं गालावर ओघळू लागली.. सरांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याला बसायला लावलं ,त्याने स्वता:च सरांना सगळं सांगितले...
आणि मग सरांनी त्याला समजवायला सुरूवात केली , "अरे आनंद, तुला सांगू का तू गरीब नाहीयेस रे! इतके दिवसपण तुझे बाबा तेच काम करायचे ना तरी तुला तू गरीब वाटला नाही आणि आज काय झालय! "
"पण सर ते फोटो पाहून मला सगळे चिडवायचे आणि जेव्हा मी ते बॅनर पाहायचो मला झटकन दरिद्री असल्याची भावना यायची....",आनंदने सरांना मध्येच अडवलं ..
"अरे एकदा फोटो आला म्हणून काय तू गरीब झालास! तुला सांगतो एखाद्याला आर्थिक परिस्थिती वरून गरीब म्हणणारे स्वतः विचारांनी दरिद्री असतात. आणि लक्षात ठेव आर्थिक गरीबीतून किमान रत्न तरी घडतात मात्र वैचारिक गरीबी वांझोटी असते, कारण ती राष्ट्राला उत्थानासाठी आवश्यक असलेले क्रांती नावाचं आपत्य कधीच देऊ शकत नाही...म्हणून तुझ्याजवळ स्वाभिमान आहे तर तू लाचार नाहीयेस.. चल उठ आता, उद्या पासुन पुन्हा समोर येऊन बसायचय हं आणि पुढच्या धड्यातले नवीन शब्द आणि त्यांचे अर्थ वाचून ये, उद्या वर्गात सांगणार आहेस तू! "
आनंद उठला आणि सरांकडे पाहून स्मितहास्य केलं की ज्यात अपार आनंद होता, साहस करण्याचं धाडस होतं....
आणि बरं का...
आता आनंदची मादक नजर केव्हाची गायब झाली होती; आता त्याच्या डोळ्यात आगीचे डोंब दिसू लागले ज्यात वैचारिक दारिद्र्य भस्मसात करण्याचं सामर्थ्य होतं!त्याक्षणी पाटील सर सुद्धा जनकाच्या भूमिकेत होते ज्यांनी एका मनात वैचारिक क्रांतीला जन्माला घातलं होतं!!
आता मित्रांनो विचार करा ; या प्रकरणाचा दोष कोणी स्वीकारायचा? उत्तर सोप्पं आहे - प्रत्येक घटक तेवढाच कारणीभूत आहे ,मात्र ती बाब सुरूवातीस वैयक्तिक स्तरावर मर्यादा राखून राहिली असती, पण जेव्हा त्या बॅनर तिला प्रसिद्ध केलं तेव्हा त्या प्रकरणाचा शिरकाव समाजाच्या परिघात झाला होता!
जर त्या बॅनरवर श्रीपतीचा फोटो नसता तर ह्या घटना मालिकेचा जन्म झालाच नसता. प्रत्येकालाच सावरून घेणारे पाटील सर मिळतील की नाही याची शाश्वती नाहीये म्हणून आपण कुणाच्या पतनाचे कारण ठरू नये हा यत्न सर्वांनी करावा!
सामाजिक जाणिवेतून केलेली मदत ही दान असते. त्याचा हिशेब ठेवायला, किंवा छायाचित्रांचा संग्रह करायला त्या मदतीचा काही देशाच्या Economic Survey मध्ये समावेश होणार नाहीये...
बौद्ध साहित्यात, दान पारमिता स्पष्ट करताना, जलकुंभ उलथून टाकल्यावर त्यात पाणी शिल्लक राहत नाही कारण कुंभाला पाण्याबद्दल आसक्ती नसते..
याचप्रमाणे ते लोक निव्वळ ढोंगी असतात ज्यांना आपल्या दातृत्वाचे उदात्तीकरण करून वाहवा मिळवायची असते! दाता होणे इतके सोपे नाहीये;
तथागथांचा प्रातीत्य-समुत्पादाचा नियम शेवटी स्वामित्वाला व त्यातून उत्पन्न होणार्या अशांतीला अधोरेखांकीत करतो ज्याचे मूळ तृष्णा असते...
व्यक्तीला स्वतःच्या कष्टाने प्राप्त केलेल्या गोष्टीचा परहितार्थ , फळाची अपेक्षा न बाळगता विनियोग करने सहजशक्य नसल्याने त्यातून स्वहित साधण्याचा व्यक्ति प्रयत्न करते आणि हे दानाचे रूपांतर सौद्यात होते! ☝️
दाता होणे सहज नाहीये;
शतेषुु जायते शूर:
सहस्त्रेषुच पण्डित:
वक्ता दशसहस्त्रेषु:
दाता भवति वा न वा।
आजच्या या आपदेच्या समयी पण आपल्या दानशूरपणाची प्रसिद्धी करणार्यांना फळे ही केवळ आर्थिक रूपात हवी नाहीत तर त्याचं स्वरूप आता सामाजिक प्रतिष्ठा आणि निवडणूकीतील मतं असं झालं आहे! ☝️
म्हणून कृपया ही बाब लक्षात राहू द्या की त्यांची गरज ही त्यांची असमर्थता किंवा अक्षमता नाहीये.... म्हणून स्वताचं दातृत्व जरी समाजासमोर मांडायचं असेल तर खुशाल मांडा त्यातून इतरांना ही प्रेरणा मिळेल मात्र ही कळकळीची विनंती ही ती मदत स्वीकारणार्याची ओळख गोपनिय ठेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आणि यासमोर ही हे फोटो प्रकरण सुरुच राहिलं तर ती परिस्थिती पाहता एवढंच म्हणता येईल की माणूसकीचं भांडवल करून सामाजिकतेच्या बाजारात आौदार्याचा धंदा मांडणार्या दलालांचा सुळसुळाट वाढलाय!😓
- गजानन संजय देशमुख©
12/04/2020