Saturday, April 17, 2021

विसावा- गजानन देशमुख

 ही रात्रही सरावी, 

तो सूर्यही उगावा, 

स्वप्नांत मांडलेला, 

तो खेळ सत्य व्हावा.. 

तू मोहरून यावे, 

मज गंध जाणवावा, 

मी गीत तेच गावे, 

तू अर्थ पांघरावा...

तू सुस्वरूप ल्यावे, 

मी रंगहीन व्हावे, 

मग मात्र भावनांचा

मेळ ही बसावा... 

 बरसून तूच यावे, 

मी विरघळून जावे, 

मातीस आपला तो, 

गंध प्राप्त व्हावा...

तू एकटे बसावे, 

गाली कधी रूसावे, 

घटका भरामधे तो, 

राग दूर व्हावा.. 

क्षणभर कधी चिडावे, 

रागात ओरडावे, 

त्या ओरड्यात पुन्हा, 

सूर आपला जुळावा... 

या स्वप्नपूर्ततेची, 

मी कामना करावी, 

ही आस का म्हणोनी, 

माझ्या मनी उरावी, 

निष्ठुर नियतीला , 

का दया न यावी, 

वियोग आपला गे, 

काहूनी घडावा...

मी चित्र रंगवितो,

शून्यात पाहताना, 

डोळे मिटून घेतो, 

संसार थाटताना, 

नंतर भल्या पहाटे, 

अलवार जाग येते, 

मग आठवांमधे तुझ्या मी, 

घेतो जरा विसावा...

 ही रात्रही सरावी, 

तो सूर्यही उगावा, 

स्वप्नांत मांडलेला, 

तो खेळ सत्य व्हावा.. 

gajanansanjaydeshmukh©

18/04/2021

Thursday, March 25, 2021

'बोंब'

 ते नियम बनवतील;

तू तुझी तत्वं सोडू नको, 

त्यांचा नियम बहुमान्य होईल,

तू एकटेपणाला डरून डगमगू नको.. 

ते तुला चूक समजतील, प्रवाहाबरोबर वाहण्याचे सल्ले देतील;

तू ते कानानिराळे कर आणि

नैतिकता मात्र सोडू नको!

त्यांची अनैतिकता कदाचित नीतिमत्ता बनू पाहिल पण तू तत्वांवर लवचिकता लादू नको... 

मग त्या प्रस्थापितांना तुझं वर्तन, 

विद्रोही वाटेल कदाचित !

पण तू निष्ठा बदलू नकोस! 

ते स्वतः वर डाग न लागण्याची काळजी घेतील, 

तू ठाम राहून व्यापक हो आणि त्यांच्याच रंगाला डाग बनंव! 

तुझा आवाजही दाबतील ते एकवेळ, 

पण त्याच हाताच्या तुझ्या तोंडावर असण्याचा तुझ्या आरोळ्यांना फरक पडणार नाही;जर तुझी वेदना रडत असेल तर! 

तो हात बाजूला सारण्याचा यत्न कर,

तो हात किंचित बाजूला सरेल तुझ्या एकवटलेल्या बळाने ;  कायमचा नव्हे: पण तात्पुरता तरी! 

या कृतीची पुनरावृत्ती होईल, 

तू पुन्हा विव्हळशील :

ते पुन्हा तुझं मुस्काट दाबतील! 

पण वेड्या विसरू नकोस, यातूनही त्यांना समजेल की,हा आपल्याच हाताने "बोंब" मारतोय, 

जशी टाळी वाजत नाही एका हाताने; 

तसं बोंबलल्याही जात नसतं एकल्या गळ्याकडून ;

त्यांचा हाताचे वारंवार फटके बसलेत माझ्या तोंडावर म्हणून आपल्या बोंबलण्याला ते स्वतःच्या सार्वभौमत्वाचा धिक्कार समजतात,एक कृत्य म्हणून नाही; तर त्यांनी दाबला तरी  आवाज निघू लागला माझा म्हणून!

मग ते त्रासून तुझ्या बोंबलण्याला आपल्या मुत्सद्देगिरीने नीतिबाह्य ठरवतील ;

तू त्याला उपमर्द न समजता, 

आपली अस्मिता बनंव! 

तु आज समजणार नाहीस पण उद्या पूजला जाशील कारण या युगातंच नसेल ती क्षमता तुला समजून घेण्याची, मला वाटतं तू रात्रीतही जन्मला असशील! 

पण तू जर बाटल्या गेलास तर, तुझा सुर्योदयावरचा अविश्वास दुनियेसमोर येईल ;

अन्यथा तुझ्या क्षणिक विरोधाला लोक 'बाजारू' तरी म्हणतील! 

म्हणतात की,'सारख्या चेहऱ्याची सात माणसं जगात असतात' पण किती बरं झालं असतं सारख्या विचाराची सात माणसं किमान असली असती तर! 

पण तू अढळ रहा, 

त्यांच्या लायकीच्या पार तुझी निष्ठा असेल तर ते शेवटी तुला नक्कीच ग्राह्य धरतील; आपला म्हणून जरी नाही तरी अपवाद म्हणूनंच सही पण त्यांना तुला लक्षात ठेवावं लागेल ;आपला सिद्धांत मांडताना, तुझ्या अढळपणाची साक्ष देण्यासाठी!

           -गजानन संजय देशमुख

            २५/०३/२०२१

https://youtu.be/3YLFvCM1ask   - सदरील लिंकवर आपल्याला या कवितेचे विश्लेषण मिळेल.. 

8600792696